Wednesday 6 January 2016

हरवलो सापडलो

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
✒ कथा लेखन विशेष✒

👉🏽शिर्षक : हरवलो सापडलो
👉🏽लेखक : ओमकार गिरकर

"मला पुन्हा एक ब्रेक हवा आहे." अरीजीत बीयरची बाटली तोंडाला लावताना राहूलला म्हणाला. "अरे, पण तू जीवाचं मलेशिया करून आलास त्याला पुरते तीन महीनेही नाही झालेत." राहूलने त्याला वाटलेलं आश्चर्य अजिबात न लपवता अरीजीतला प्रतिसाद दिला. अरीजीत काहीही न बोलता शांत एकटक बाटलीच्या निमुळत्या तोंडाकडे पहात राहीला. अलगद एक घुटका घेत म्हणाला, " मलाच कळत नाहीय मला काय हवंय ते.." तर यावर राहूलचं इरसाल उत्तर, "लग्न कर. इशा तयारच आहे. तुच चालढकल करतो आहे."
      "चालढकलीचा प्रश्न नाही रे. लग्न म्हणजे केवढा खर्च होतो. आता मी उगाच मलेशिया ट्रीप केली असं वाटतंय. पैशांचा फालतू चुराडा झाला."
       यावर राहूल अगदी मिश्कील हसत म्हणाला ," विपश्यनेला जा. तू भरकटला आहेस. " अरीजीतने अगदी गंभीरपणे प्रश्न केला. " खरंच म्हणतोयस? मी भरकटलोय? काय कमी आहे ते समजतंच नाही." यावर राहूल त्रासला," चील यार, अऱ्या. बीयर पी. कोमट झाली तर घोड्याच्या मूतासारखी लागेल. "
अरिजीतने गुगली टाकली. " तू कधी घोड्याचं मूत चाखलंस?"... हाहाहाहा... दोघंही हसू लागले.
        दुसऱ्या दिवशी शनिवार होता. अरीजीत तरीही नेहमीसारखं साडे सहाला उठला. ब्रश करताना आरश्यासमोर उभा राहीला. तर त्याच्या दाट केसातला डोकावणारा एक पांढरा केस त्याला त्रास देवू लागला. म्हणून तो शांत आरामखूर्चीत बसून पेपर वाचत ब्रश करू लागला. सगळं आवरल्यावर अॉफीसला जायच्या वेळेवर ट्रॕक पॕन्ट टीशर्ट घालून तयार झाला. गाडीची चावी घेतली आणि हॉलमधूनच आत किचनमधे काम करणाऱ्या आईला हाक मारली. "आई, मी मित्राकडे जातोय. रात्री उशीर होईल." आई काय बोलतेय ते ऐकण्याआधीच हा दरवाजा बंद करून निघून गेला.
      नवी मुंबईतील एका पॉश वसाहतीत अरीजीत राहात होता. पार्कींगमधे येऊन गाडीत काही क्षण तसाच बसून राहीला. आईशी मित्राकडे जातोय असं सांगून निघालेल्या अरीजीतलाही माहीत नव्हतं तो कुठे जातोय ते. गाडी कॉलनीतून बाहेर निघाली. अरीजीत अनिश्चित दिशांना कुठेही जात पनवेलपर्यंत आला. तिथे एका चौकात अगदी समोरचा रस्ता कोकणाकडे जाणारा होता. डाव्या बाजूला वळला असता तर तो पुन्हा घराकडे गेला असता. काय करायचं ते त्यालाही कळेना. मग त्याने खिश्यातून एक रूपयाचं नाणं काढलं. ते टॉस केलं. नाण्यावर काटा पडला तर तो कोकणाकडे जाणार होता. काटाच पडला. पण, त्याची बुद्धी सांगत होती. 'कुठे कोकणात जातो. रस्ते नीट नाहीयत. पावसाळा अजून थोडासा बाकी आहे. चल घरी.' मग याने पुन्हा टॉस केला. पुन्हा काटा. असं सात आठ वेळा केलं तरी काटा आणि कहर म्हणजे नाण्यावरचं एक रूपयाचं टोक कोकणच्या दिशेला. ही काय भूताटकी आहे यार. . ठीकाय .. चलो कोकण. असं स्वतःशीच बडबडत तो पुन्हा गाडीत बसला.
         इंदापूरच्या जवळपास आल्यावर पुण्याकडे जायला एक फाटा फूटतो. याने त्या रस्त्याकडे गाडी वळवली. एका टेकाडाच्या माथ्याजवळ गाडी थांबवून आसपासचं असीम निसर्गसौंदर्य तो न्याहाळू लागला. पावसाळ्याची अखेर होती, झरे अजूनही भरभरून वाहात होते. खाली उतारावर काही शेतकरी शेतात काम करताना दिसले. बाजूला काही मुलं चिखलभरल्या शेतात कबड्डी खेळत होती. याने छत्री वैगरे काही न घेता पाकीट मोबाईल सर्व गाडीत टाकली. गाडी व्यवस्थित पार्क करुन त्या शेताजवळ आला. ते शेतकरी भराभर आपापलं काम करत होते. मुलं फार खिदळत खेळत होती. ती मुलं फार लहान नव्हती. याच्यापेक्षा दोन चार वर्षांनी लहान असावी. याने निरखून पाहीलं. अंगभर चिखल ल्यालेली ती मुलं अजूनच खोलखोल चिखलात जाऊ पहात होती . याला आधी फार विचित्र वाटलं ते सगळं. पण, त्या मुलांची मस्ती पाहून आपण पण कबड्डी खेळूया अशी इच्छा याला झाली. त्याने पुढे होऊन 'मी पण येऊ का' अशी विचारणा केली. ती मुलं खेळ थांबवून या आगंतुकाकडे कुतूहलाने बघू लागली. "हा .. या ना" हा झकपक कपडे घातलेला माणूस चिखलात का येतोय हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण , अरीजीतने अगदी उत्साहात लाल पिठल्यासारख्या चिखलात उडी मारली. पार तोंडावर पडला तो. पण कोणास ठाऊक कसं त्याला बरं वाटलं. गार गार वितळलेल्या चॉकलेटसारखा चिखल.
         बराच वेळ खेळून तो त्या मुलांसोबत एका ओढ्यावर गेला. तिथं पाण्याच्या धारेखाली शांत मांडी घालून बसला. पाणी थडाथड डोक्यावर आपटत होतं. शॉवरचा नाजूकपणा नाही. निसर्गाचा रानवटपणा.. पण, सगळे विचार वाहून जात होते त्या प्रवाहासोबत. मनभरून आंघोळ झाल्यावर हा पुन्हा गाडीपाशी आला.
         सकाळी जीमला जायचे म्हणून घेतलेले कपडे गाडीतच होते. ते बदलून सोबत घेतलेली फळं खाल्ली. भूक सणसणीत लागली होती. तिथून निघून तो एका डोंगरकड्यावर आला. दूरवर समुद्र दिसत होता. शांत , स्वच्छ समुद्रकिनारा लांबवर पसरला होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. बाजूच्या एका मोठ्या अळवासारख्या वनस्पतीच्या पानावर टपोरा थेंब होता. त्यात त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहीलं. हळूच तो थेंब सरकून गेला. एक नवा थेंब जमू लागला. त्यातही तोच स्वतःला पाहु शकत होता. थेंब जमायचा मोठा व्हायचा विरघळून जायचा. आपल्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा अशाच जमतात. निथळून पडतात. एक निवांतपणाची भावना आसमंतात होती. अरीजीतला समजून चुकलं. तो स्वतःलाच शोधत होता!

No comments:

Post a Comment